Thursday, November 22, 2012

रिकामपणाचे उद्योग..


कॉलेजमध्ये कुणीतरी एक लेटरपॅड विसरून गेलं होतं. गुलबट-बदामी पानं आणि खालच्या कोपर्‍यात दोन-तीन चित्रे थोड्या थोड्या अंतराने आली होती. त्यातलं एक चित्र जाम आवडलं होतं म्हणून त्याचं एक पान मी फाडून घरी आणलं. तीन-चार वर्षे तशीच गेली. मध्येच मी माझा पहिला वहिला बाऊल रंगवला, त्यानंतरही ग्लास पेंटिंग केलं आणि मग या बाईला पेंट करावं अशी मनानं उचल खाल्ली. माझ्या घरातल्या स्वयंपाक घरात उघडणारा हॉलचा दरवाजा भिंतीच्या मधोमध आहे. तेव्हा दोन्ही बाजूला काहीतरी पेंट करून लावल्यास छान दिसेलसं वाटलं. साधारण प्रमाण पाहता ए३ हा आकार चांगला दिसेलसं माझं मीच ठरवलं. बरेच सव्यापसव्य करून ते दीड इंच बाय तीन इंचाचं चित्र आधी ए४ आणि नंतर ए३ मध्ये एका कागदावर छापून आणलं. पण तेही नंतर लहान वाटलं म्हणून कसंबसं ए२ आकारातलं रेखाचित्र जमवलं. तरीही कितपत जमेल असा आत्मविश्वास नसल्यानं आधी एका ट्रान्सपरन्सीवर रंगीत तालिम घेतली आणि किमान 'हे जमू शकेल' असं म्हणून स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.

पहिली पायरी: जीटी मारणे (पक्षी: ग्लास ट्रेसींग). इंजिनिअरिंगला असताना कधी न करावा लागलेला प्रकार आता मी सहज करते!
हे चित्र पूर्णपणे ट्रेस करायला साधारण दोनेक तास लागले.

1

पृष्ठभाग बाऊलसारखा गोलाकार नसल्याने रंग ओघळणं ही अडचण नव्हती. फक्त रंगांच्या बुडबुड्यांनी तोंडाला फेस आणला. हे पहिलं पूर्ण चित्र.

2

नीट जमत आलेलं काम बिघडवण्याची माझी परंपरा यावेळीही खंडित झाली नाही. काही ठिकाणचा रंग तुलनेने पातळ वाटत होता म्हणून मी रात्री झोपायला जाताना आणखी एक रंगाचा थर दिला. सकाळी उठून पाहते, तर खालचा रंग फाटून सगळं चित्र अगदी चित्रविचित्र झालं होतं. आधी चुकचुक, मग नेहमीप्रमाणेच "कशी मला दुर्बुद्धी झाली?", "आता काय करू" वगैरे नेहमीची पालुपदे आळवून झाल्यावर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच झाला पराक्रम निस्तरायला स्वारी सज्ज झाली. एका बोथट चाकूने तो फाटलेला रंगाचा भाग वरच्यावर कापला, काही ठिकाणचं बाजूचं काळ्या रंगाचं रेखाटनही 'तेरा मेरा साथ रहे' म्हणत सोबत निघून आलं. लगोलग 'जालिम जमाना' बनत त्यांचा साथ मी तिथंच कापून टाकला. मग, आधी रेखाटनाची दुरूस्ती केली. फाटलेला नारिंगी रंग संपला होता म्हणून तिथे आता चॉकलेटी रंग देऊन टाकला. आणि "लहान मुलं असतील नसतील तेवढे सगळे रंग वापरतात तसं माझं चित्र वाटत नाहीय. ना?" असं म्हणून नकारार्थी उत्तराला जराही वाव न ठेवता निखिलकडून "चित्र चांगलंच झालंय" अशी पावती घेतली.

इतके दिवस मला काही फ्रेम करून घेण्याची गरज पडली नव्हती. त्यामुळं आता फ्रेम करणारं माणूस/बाईमाणूस शोधणं आलं. मध्येच एकदा खरडाखरडीत पराग मांडेच्या खव मध्ये मी ट्रान्सपरन्सीचा फोटू डकवून आले होते. तो पाहून लीमाऊजेट्ने "ही हेदर ना गं?" असा प्रश्न विचारून पुढे याच्या पार्श्वभूमीवर इजिप्तमध्ये पपायरस्/पॅपीरस नावाचा गवतापासून बनवलेला हातकागद वापरतात असं सांगितलं. आतापर्यंत ही चित्रातली बाई कोण याचाही गंध नव्हता, पण अज्ञान उघड होऊ नये म्हणून तिला "हो..हो" केलं. अधिक शोभा नको म्हणून आता त्या मेल्या 'पपायरस' सदृश्य काही मिळवायचा प्रयत्न चालू केला. जुन्या काडाच्या चटया सहसा मिळण्यासारख्या नव्हत्या आणि अधिक त्रास घेणं माझ्या आळशीपणाला मानवणारं नव्हतं. म्हणून मग मूळ योजनेबरहुकूम मी हातकागद शोधायला लागले. हेदर जणू माझ्यावर प्रसन्न झाली आणि मला चटईसारखा दिसणारा हातकागद मिळाला. हुश्श. आता सुटले म्हणेतोवर जो मला फ्रेम करणारा भेटला तो फक्त सकाळी ११ ते १२:३० व संध्याकाळी ६:३० ते ७:३० असं हौशीखातर काम करणारा महाभाग. त्याने पुढे त्याच्या व्यवसाय धर्माला जागून मी निवडलेली फ्रेम न लावता दुसरीच कुठलीशी फ्रेम लावली. सुदैवाने तीही जरा बरी होती.

हेदरः
3

आता मला दुसर्‍या बाजूची फ्रेम करायची होती. आता हेदरबाईंमुळे दुसर्‍या बाजूलाही कुणीतरी इजिप्शियन सोबत आणावी असं वाटत होतं. होता होता तुतनखामेनचा बळी द्यायचं ठरवलं. दरवाजाच्या दोन्ही बाजूंचं सारखेपण जपायचं असल्यामुळं जर लवकर चित्र दिलं नाही तर तशीच फ्रेम पुन्हा मिळणार नाही असं त्या फ्रेमवाल्यानं सांगितलं. हे त्याचं पुढचं काम मिळवण्याचं गिमिक असू शकेल असं वाटूनही मी धोका पत्करायला तयार नव्हते. आणि नुसत्या काचेच्या आकाराने तो मापं घ्यायला आढेवेढे घ्यायला तयार नव्हता. अशा वेळेस जे होतं तेच झालं. तयार होता होता पुन्हा एकदा ९८% तयार झालेलं चित्र बिघडलं. त्यानंतर आठवडाभर आम्ही गावी चाललो होतो. आता " जे व्हायचे ते होऊ दे" असं म्हणून फ्रेम-सारखेपणा-आणि जे जे काही असेल ते गेलं खड्ड्यात म्हणून सरळ त्या बिघडलेल्या तुतनखामेनकडे तुच्छ कटाक्ष टाकून आम्ही घराबाहेर पडलो. तसंही या चित्रापायी "हा बाई का बुवा जे काही आहे ते जरा इथून हलव" असले शब्द ऐकून मला या चित्राचाच कंटाळा आला होता.
परत आल्यावर नव्याने तयारीला लागले. आधी चाकूने रंग-रेखाटने कापून आणि त्यातल्या दाद न देणार्‍याला भागाला मस्तपैकी भांडी घासण्याच्या उपकरणांनी घासून काच पुन्हा पहिल्यासारखी केली. सुदैवाने किंवा जे काही असेल त्याप्रमाणे तश्शीच बाजूची फ्रेम मिळाली आणि एकदाचे तुतनखामेनोबा घरी आले.

4

या दोघांची स्थापना करून वर्ष उलटून गेलं आहे. दिवाळीनिमित्त काही वेगळ्या प्रकारातले कंदिल पाहून आणि माझी रंगांची आवड पाहून एका मित्राने मला असले पाच कंदिल आणून दिले. त्यातला एक अजून रंगवला नाहीय, दुसर्‍यावरचं चुकलेलं रंगकाम मी अजून दुरूस्त करतेय. हे बाकीचे तीनः

5

6

7

याने खूपच जास्त वेळ घेतला

8

ग्लास पेंटिग करताना मला गवसलेली विचारमोत्ये:
१. सराव म्हणून बाऊल सारखा आकार न घेता सपाट पृष्ठभाग घेतल्यास बरे.
२. चित्रात एखादा आकार खूपच मोठा असल्यास एकीकडचा रंग देऊन दुसरीकडे जाईपर्यंत आधीच रंग वाळतो आणि नंतर मग डाग दिसू लागतात. उदा. तुतनखामेनचा चेहर्‍याचा आणि मानेचा भाग. ते टाळण्यासाठी काही करता येत नाही; हात जरा भराभर चालवावा.
३. चित्र बिघडल्यास जास्त घाबरू नये, सरळ निघेल तितका रंग बोथट चाकूने काढून भांडे/काच घासून घ्यावे. काच चांगल्या प्रतीची असल्यास काही फरक पडत नाही. नसेल, तर काचेचा घासलेला भाग खरबरीत तर न घासलेला गुळगुळीत असं खूपच चिवित्र दिसतं. अशा फालतू संकटांनी डगमगून न जाता आधीचं डिझाईन रद्दबातल करून त्याठिकाणी *चित्रविचित्र दिसणारे मॉडर्न आर्ट काढावे. पाहणार्‍यास आपण चतुरस्त्र आहोत आणि सगळ्या कलाप्रकारात आपणांस रूची आहे असे वाटते. त्यानंतर उगीच खुलासे करून 'झाकली मूठ' उघडण्याचा प्रयत्न करून नये.
*-> इथे ठरवून या प्रकारचे डिझाईन काढले आहे. सध्याचा दुरूस्त करत असलेला कंदिल पूर्ण झाला की नक्की एन्ड प्रॉडक्ट कसे होते ते इथेच सांगेन.
४. हे तसे बरेच वेळखाऊ काम असल्याने विरंगुळा म्हणून "सीआयडी" ही मालिका टीव्हीवर लावावी. टीव्हीकडे न पाहताही आख्खा इपिसोड झक्कास कळतो. आणि छान मनोरंजन होते.
उदा. "दया, ये आदमी यहाँ क्यूं खडा है?"
"हाँ सर, ये आदमी बसस्टॉपपे क्यूं खडा है?"
"अभिजीत, देखो उसके हाथ में ब्राऊन कलरका लिफाफा है."
"हां सर, कितना बडा लिफाफा है, ऑर उसमें कुछ रखा भी है"
" ये यहाँ पिछले दस मिनिटसे खडा है"
"देखो दया , एक नीले रंगकी बस आ रही है"
"हां सर, ये नीली बस तो इसी आदमी की तरफ आ रही है"
"देखो, ये तो बसमें चढ गया" :)
५.  लेख नाहीतर गेलाबाजार किमान फेसबुकावरतरी म्हणून फोटो डकवून लोकांकडून 'चान चान' म्हणून घ्यावे


footer

Sunday, October 21, 2012

A heritage walk

खूप दिवसांपासून ठरत होतं, पण योग यायचा होता. तो या शनिवारी आला. काळ्या घोड्याचंही एक निमित्त होतंच. फोनाफोनी करत, मोडकांना ट्रेनची सफर(ही हिंदी/मराठी बरं का, इंग्रजीमधली नव्हे) घडवत फोर्टात पोचलो. एलआयसीच्या दर वळणानजिक दिसणार्‍या शाखेबरोबरोबर रामदासांची ब्रांच ही तर नव्हे अशा शंका मनी बाळगत एकदाचे त्यांच्या हापिसात पोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच रामदासांनी टेबलाखालून एक मोठं बाड बाहेर काढलं, '१९४५ ते बहुधा १९५६ पर्यंतचे टाईम मासिकाचे अंक' होते ते. खजिनाच तो, दुसरा शब्दच नाही!!
हापिसातून उतरून खाली आलो, आणि अलीबाबाच्या पोतडीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली. रस्त्याच्या दुतर्फा ताशीव दगडांच्या, मजबूत आणि प्रशस्त इमारती. प्रत्येक इमारतीची स्वतःची एक कहाणी. ती कुणी बांधली, त्या मूळ मालक कंपनीचं पुढं काय झालं, तिची किती, कशी आणि कोणत्या कारणाने हस्तांतरे झाली, हा सगळा इतिहास सांगायला रामदासच हवेत.

देशेदेशीच्या  वास्तुशिल्पकलेचे नमुने इथल्या इमारतींमध्ये साकारले आहेत. या पहा रोमन शैलीतले खांब मिरवणार्‍या इमारती:





इतरांच्या हातचं पाणी न चालणार्‍या भटांसाठी राजस्थानी ब्राह्मणांनी चालवलेलं चहाचं दुकान. पाटीचं स्वरूपच दुकान किती जुनं असेल हे सांगायला पुरेसं आहे.




ही आहे पारशी लोकांची विहीर. काळाच्या ओघात तिची देखभाल होत नाहीय, पाणी दूषित होतं आहे आणि आजूबाजूलाही अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. साहजिकच त्यामुळं ती सध्या बंद अवस्थेत आहे.
विहीरीचा दुरून काढलेला फोटो:


विहिरीवरची भित्तीशिल्पे:




विहिरीवरचा फारसी/इराणी मजकूरः



ग्रीक शैलीतली (बहुधा मार्शल & मार्शलची) इमारतः





मोडकांनी उल्लेखलेलं इटालियन मार्बलः


थोडंसं दुरून पाहिलं की दुरवस्था लक्षात येते:


या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर भित्तीशिल्पं आहेत. मी फक्त पहिल्या मजल्यावरच्या शिल्पाचा फोटो घेतला आहे.


लढवय्या पुरूष, त्याची लेकुरवाळी स्त्री आणि ड्रॅगनशी झुंजतानाचा त्याचा अविर्भाव अगदी प्रेमात पडावं असाच!!

प्रसिद्ध स्ट्रँड बुक स्टॉलः


सगळ्या विलायती शैलींमधून आपलं वेगळेपण दाखवणार्‍या इमारतीवरची ही लक्ष्मीची मूर्ती:


काळाच्या ओघासोबत न बदललेली आणि अजूनही लाकडावर चालणार्‍या भट्टीची बेकरी:


माझ्या सोबतच्या चारही लोकांची तोंडं चार दिशांना आहेत!!

बेकरीवरच्या पाट्याही तितक्याच जुन्या आहेत.





इथली खारी, मावा केक  आणि बन मस्का इतका रूचकर होता की फोटो काढण्याचं लक्षातच आलं नाही. खास यांचा आस्वाद घेण्यासाठी इथं कितीही वेळा जाण्याची माझी तयारी आहे. :-)

हे रेमण्डसचं दुकान, पण इतर दुकानांहून जास्त महत्त्व मिळालेलं. शपथविधीपूर्वीचे मंत्र्यासंत्र्यांचे कपडे इथेच शिवले जातात म्हणे. (आर आर आबांनी मात्र ही परंपरा मोडली. शपथेपूर्वी की नंतर हे माहित नाही)


ही देखणी इमारत इथे मुंबईतच आहे असं कुणी सांगितलं असतं तर माझा त्यावर विश्वास बसला नसता.




तिच्या शेजारची ही दुसरी इमारतः


या दोन इमारतींसमोरच हे शांत, धीरगंभीरसं चर्च.


याची बहुधा पुर्नबांधणी झाली असावी. ही त्याच चर्चची मागील बाजू.


पारशांची विहीर बुजवली असली तरी एशियाटिक सोसायटी समोरील ही १८७३ साली बांधलेली विहीर वापरात आहे. तिच्यावरची कोनशिला:


तिथेच असलेला हंडा:


यानंतर एशियाटिकसमोर काळाघोडा संगीत महोत्सवातला कार्यक्रम चालू होता. अद्याप चालू व्हायचा होता, पण ऐकू येणार्‍या तबल्यावरच्या खड्या बोलांनी जागीच थांबवलं. तालबद्ध लयीत सहजगत्या एकेक बोल लीलया निघत होते. माईक टेस्टिंगसाठी असा काही तुकडा वाजवला की यंव रे यंव!! पण मुख्य कार्यक्रम चालू व्हायला बराच अवकाश असल्याने काढता पाय घेतला.

मोडकांनी यांना नांव दिलंय, टिपकागद!




निघताना मोडकांनी या फोटोंवरती कधी लिहितेयस असं विचारलं, आणि मी आळस केल्याचं सार्थक झालं!! :-)

बॉम्बे टॉकी

ऑफिसमधल्या बर्‍याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण  लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं.  त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्‍याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता. म्हणून पुन्हा एकदा नव्याने त्याचा 'माफीचा साक्षीदार' शोधत होते. तो मिळाला नाहीच, पण त्यानिमित्ताने दुसरेच सिनेमे डाऊनलोड झाले. 'बॉम्बे टॉकी' बद्दल काही माहिती नव्हतं, पण 'गुलाबी टॉकीज'च्या नावाशी साधर्म्य आणि नावावरून काहीतरी चांगलं असेल असं वाटून तोही डाऊनलोड केला.
     
      पाहायला सुरूवात केली. सर्वात आधी नट-नट्यांची नावं आली. शशी-कपूर जेनीफर म्हणजे चांगलाच असेल पण कदाचित समांतर देखील असू शकेल असं वाटलं. जस-जशा पुढच्या पाट्या येत गेल्या तेव्हा मात्र ज्या कुणी ही संकल्पना मांडली असेल त्याला दाद द्यावीशी वाटली.  सिनेमा तब्येतीत पाहायचाय हे तेव्हाच नक्की झालं. त्यामुळे तो निवांतपणे पाहीन. सध्या फक्त तुम्ही या टायटल्सचा आस्वाद घ्या.

Bombay Talkies

Poster1

Poster1

 

 

 

 

 

 

 

 

 



 


 

 

हे वरच्या फोटोवरचे लाटांचे तुषार अगदी खतरनाक!
 

 


मला ही जागा काही ओळखता आली नाही. कदाचित इतकी रिकामी दिसत असल्याने असावी.
 

गेल्या आठवड्यालत्या लोकसत्तामध्ये टीव्ही कलाकारांना त्यांच्या मालिकेतल्या नावांनीच ओळखले जात असल्याने आणि एक संपली की लगेच दुसरी मालिका चालू करण्याच्या नादात वाहिन्या या अभिनेत्यांची नामावली गाळत असल्याचा लेख होता. मला वाटलं. की यांना निदान कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखलं तरी जातं. पण पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ यांसारखे लोक सर्वसामान्यपणे लोकांना माहितही होत नाहीत. अशा परिस्थितीत बॉम्बे टॉकीजची नामावली खरीच अभूतपूर्व (काही कॅरीकेचर्स पाहिलीयेत, पण बहुधा ती त्या-त्या त्ंत्र प्रकारातल्या लोकांची वाटतील अशी होती, त्यावरून हाच तो माणूस असं ओळखणं अवघड असावं.) म्हणायला हवी.


टीपः लेखातील सर्व छायाचित्रे व्हीएलसी प्लेअर मधील स्नॅपशॉट हा पर्याय वापरून काढलेली आहेत, आंतरजालावरून उतरवून घेतलेली नाहीत.)

Wednesday, February 15, 2012

माझी मद्रास ची सफर- भाग अंतिम

तसं बरंचसं लिहून झालंय चेन्नई/मद्रास बद्दल... देवांनी तर सविस्तर लिहिलं आहेच.. नि बरीचशी जनता ही तिकडे राहून आल्यामुळेही अनुभव जवळ्जवळ सारखेच असतील... पण माझ्यामते... आणखी एक-दोन गोष्टींच्या उल्लेखाविना ही सफर नक्कीच अपूर्ण राहिल...

पहिली गोष्ट म्हणजे.. दाक्षिणात्यांचं वागणं!!!
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं.. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.. माझ्या पाहण्यातले बरीचशी गुजराती,उत्तर प्रदेशातील कुटुंबे आहेत की ज्यातल्या अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याना चांगली मराठी नि हिंदी बोलता येते.. जर मराठी बोलता येत नसेल.. तर त्यांना कळते तरी नक्कीच.. माझ्या उत्तरभारतीय मैत्रिणीची मुलगी मराठी पाळणाघरात जाते.. तिच्याशी हिंदी बोलले तरी ती उत्तर मात्र शुद्ध मराठीत देते.. काका-मामा-मावश्या-आत्या-आई-बाबा याना मराठी येतंच... दोन्ही आजी-आजोबाच काय.. पणजोबाही मोडकं तोड़कं का होईना.. तिच्याशी मराठीत बोलतात.. मग हे दाक्षिणात्यच असे का वागतात..?? ज्या ठिकाणी १०-२० वर्षं राहतात.. तिथली भाषा कळत नाही असे का म्हणतात..??
त्यावरचं उत्तर खरंच चपखल आहे.. ते दिलं एका तमिळनाडूमध्ये लहानाचे मोठे झालेल्या एका गुज्जुभाईने.. तर त्यांच्या मते.. "तमिळ माणूस हा स्वतःच्या कोशात राहणारा प्राणी आहे.. त्याच्या मनात काय चालू असेल... कुणीच सांगू नाही शकत.. घरातल्या घरात भावा-भावा मध्ये कोश असतात.. पण जेव्हा प्रसंग दुसर्‍या कुटुंबासोबत येतो.. तेव्हा तो कोश थोडाफार स्वतःच्या कुटंबापुरता विस्तृत होतो.. त्याप्रमाणे जेव्हा आपला प्रदेश सोडून ते बाहेर जातात.. तेव्हा तो कोश आपल्या भाषेपुरताच ठेवतात.. असं म्हणतात की एका ठिकाणी एका मद्राशाला नोकरी द्या.. तो लगेच आपल्या मागे इतरांची रांग लावेल.. तेही या कोश जीवनपद्धतीमुळेच... दुसरी भाषा समजते असं म्हटलं तर त्या कोशात बाहेरचे लोकही येतील असं त्याना वाटतं नि त्यांना ते कोणत्याही परिस्थितीत नको असतं... आता थोडं परिवर्तन येतं आहे.. पण जुनी खोडं बदलणं खरंच अवघड आहे...."
आश्चर्य म्हणजे सगळ्याना हे उत्तर पटलंही.. नि बर्‍याच जणांनी असंही म्हटलं की हे खरं आहे.. पण असं नेमकं शब्दबद्द करणं त्यांना स्वतःलाही जमले नसतं... खरंय!!! आपल्या इथेही दोन पिढितला हा फरक मी खुपदा अनुभवलाय..

असो.. त्या लोकांबद्द्ल खूप झालं.. तुम्हाला माहित आहे.. आपले लोक तिकडे गेले की कसे वागतात???
मी आधीच सांगितलं ना पहिल्या भागात की मला तिथे एक नातेवाईकांकडे जायचं होतं..तर त्यांचा मुलगा बी. एस्सी. च्या प्रथम वर्षात होता.. त्याची माझी ऑर्कुट्वर ओळख झाली.. निरोप्यावर गप्पाही बर्‍यापैकी झाल्या होत्या.. नि त्यामुळेच त्या लोकांना मी तिकडे येणार अशी खबर मिळाली होती.. मी पोचल्यावर त्याला फोन केला.. म्हटलं एवढं मोठं चेन्नई... त्यात मला तमिळ येत नाही.. रिक्षावाल्यंबद्दल पण काही चांगलं ऐकलं नाहिये.. नि २० मिनिटांचंच तर अंतर आहे मोटरसायकल वरून... पण तो बेटा काही यायला तयार नव्हता.. अस्सा राग आला.. कालपर्यंत तर नीट होता.. त्याच्या गावात आले तर याला भाव चढला.. थोड्या घुश्श्यातच कसं यायचं ते विचारलं नि तत्क्षणी आईला फोन करून सांगितलं.. की फक्त तू म्हणतेयस म्हणून जातेय.. पुन्हा जा म्हणून सांगू नकोस..हो म्हणाली बिच्चारी..
बाहेर आल्या-आल्या गेस्टरूमच्या रखवालदाराने सांगितलं की विजेरी वरच्या बसेस दर १५ मिनिटाला येतात.. तिने तुम्हाला मुख्यप्रवेशद्वारापर्यंत जाता येईल..म्हटलं बरं झालं.. नाहीतरी सकाळी ११:३० च्या दरम्यान मी आले होते.. नि त्यावेळी आय आय टी चे आवार म्हणजे एक जंगलच वाटलं होतं.. रस्त्यावर एखदं माणूस कुठेतरी.. नाहीतर.. किर्र झाडी.. मुंबई आय आय टी सारखे सायकलवरून जाणारे विद्यार्थी नाहीत.. एखादी इमारत कुठेतरी.. जाम टरकले होते.. अशा परिस्थितित दुपारी ३-४ वाजता काही वाहन मिळणे कठीण होते.. नशीब या बसेस तरी होत्या..
तर मला जायचं होतं गिंडी स्थानकापासून तिरूमलायै स्थानकापर्यंत.. (हो तेच ते.. तिरूमलायै.. खत्रूड पाटीवालं)!!! आय आय टी च्या मुख्य प्रवेश्द्वारापासून गिंडी पर्यंत रिक्षावाल्याने सांगितल की ४० रू भाडं होईल.. मीटर प्रकरण कुणाच्या गावीही नव्ह्तं.. मी मुंबईकर.. थोडं बारगेन करण्याचा प्रयत्न केला.. कुठलं काय... त्याने भाडं कमी करणं सोडा.. सरळ निघून गेला..!!! त्यानंतर ५०-- ६० अशी चढती भाजणी चालू झाली तेव्हा निमूटपणे ६० रू ठरवले.. नि मंडळी कसचं काय... इथं मुंबईत तेवढ्या अंतराला अवघ्या नऊ रूपड्या मोजतो हो आपण.. (नंतर प्रत्येकवेळी आम्ही तेवढं अंतर चालूनच गेलो!!!) मनात म्हटलं.. अक्कलखाती पडले..!!! रेल्वे दुसर्‍या मजल्यावर येते.. इंडिकेटर मुंबईसारख्या मागास्लेल्या भागात हो.. तिथे सगळे बहुधा विजयकांथ किंवा रजनीकांथ ची दिव्य पॉवर घेऊन येत असावेत.. ट्रेन आली..

Tuesday, February 14, 2012

गोळाबेरीज? छे:, बाकी शून्य!!




 "A picture is worth a thousand words!" हे जर चित्राबद्दल असेल, तर दृकश्राव्य माध्यम तर त्याहून प्रभावी म्हणायला हवं. अर्थात ही झाली अपेक्षा, प्रत्यक्षात तसं होतंच असं नाही हा प्रत्यय बर्‍याचदा येतो. मला ही आला. 'दा विंची कोड', 'शाळा' ही अलीकडली उदाहरणं. त्यात आता पुलंच्या सार्‍या व्यक्तिचित्रांची भर पडलीय. त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच.
सारांश सांगायचा तर, सिनेमात एकंदरीत सगळ्याच गोष्टींची वाट लावली आहे. बालगंधर्व मध्ये नारायणरावांच्या चरित्राचा स्लाईडशो होता असं म्हटलं तर गोळाबेरीज म्हणजे प्रत्येक व्यक्तीचित्र हे एका स्लाईडवरचं बुलेट पॉईंट आहे. चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासातच बरेच जण हजेरी लावून जातात. त्यामुळे व्यक्तिरेखा फुलणं हा प्रकार होत नाही. चितळे मास्तर, हरितात्या, भय्या नागपूरकर, अंतू बर्वा, नाथा कामत एक ना दोन!! प्रत्येकजण आपापल्या व्यक्तिरेखेची चार वाक्यं म्हणतात आणि निघून जातात. उदाहरणार्थ भय्या नागपूरकर आणि कुठल्याशा परांजपे साहेबाला एकेरी संबोधून 'डोन्ट वरी' म्हणणारा बापू अनुक्रमे चाळीस व तीस सेकंदात आणि पाच व चार वाक्यांत आटोपले. यांना न घेताही मग काम चालू शकलं असतंच की. सगळंच दाखवायला हवं हा अट्टहास का? हा प्रश्न पुन्हा एकदा पडला. त्यातल्या त्यात नंदा, गटणे, चितळेमास्तर या लोकांना पुन्हा संधी देऊन त्यांना अगदीच उडवलं नाही हे दाखवतात. पण सगळ्यांच्याच बाबतीत असं म्हणता येत नाही.
पुलंची व्यक्तीचित्रे जशी अजरामर तशीच त्यांनी लिहिलेली वाक्यं माराठी मनावर कोरली गेली आहेत. आमच्या नंदनलाच विचारा, एका क्षणात सटासट दहा वाक्यं फेकेल. तर या अशा वाक्यांची तर चुकीच्या संवादफेकीने अक्षरशः वाट लावलीय. वानगीदाखल सांगायचं तर "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे झंप्या?" हे वाक्य प्रश्नार्थक न येता तारस्वरात विधानार्थी येतं, तसंच "इथं पण ऑटोमॅटिक होतं की कुंथायला लागतं?" या टंग इन चीक वाक्याची तर अगदी फेफे उडवलीय. पुलंनी लिहिलेली वाक्यं कुठं ना कुठं वापरायलाच हवीत या समजाने ती काही ठिकाणी घुसडल्यासारखी वाटतात. सिनेमातले पुलं स्वगत बोलताना चेहर्‍यावर सास बहू सिरियलमधल्या बायकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त हावभाव दाखवतात. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटात नर्मविनोद आणि सटल्टी या दोन गोष्टी जाम हरवून गेल्या आहेत.
दिग्दर्शन कसं असावं याबद्दल जास्त काही बोलता येत नसलं तरी 'किमानपक्षी' कसं असावं याच्या काही माफक अपेक्षा असतात. आनंदवनातलं कथाकथन संपल्यावर बाबा आमटे पुलंना भेटायला येतात. प्रथम दिसतो तो त्यांचा कटिप्रदेश(!) आणि मग कॅमेरा वर जाऊन चेहर्‍यावरती स्थिरावण्याऐवजी तो पाठी जाऊन होऊन आमटे उर्ध्व-अधर दिशेने वाढतात. गदिमांची आई किंवा बायको, "अधून मधून दिसत जा" म्हणते आणि निर्विकार चेहर्‍याने फ्रेममधून निघून जाते. संवाद म्हणताना जर तिचा चेहरा दाखवला नाही, तर नंतर आणि तोही असा दाखवायची गरज काय? तसेच चित्रपटभर नको तिथे संगीत आणि भरीस भर म्हणून क्लोज-अप्सचा भडिमार आहे. नवीन कॅमेरा घेतला की आपण जसे दिसेल ते चेहरे टिपायला लागतो तसे इथे पडदाभर नुसतेच चेहरेच चेहरे दिसतात. पुलं वृद्ध होतात पण त्यांचा मित्र बबडू अगदी तरणाबांड आहे, नंदा प्रधानची आई ही सुद्धा पुलंच्याच वयाची दिसते. नंदा शेवटपर्यंत पहिल्या दृश्यात दिसला तसाच दिसतो, वार्धक्याचा कुठे इतकासा म्हणून लवलेश नाही. त्याची आई कुठल्याही अँगलमधून श्रीमंत-सुखवस्तू बाई वाटत नाही. एक ना दोन!!! इतर गोष्टींबद्दल सांगायचं तर आपला सिनेमा विंटरनॅशनल फिल्म फेष्टिवलमध्ये दाखवला जाणार असल्याची खात्री असल्याने सगळ्या पाट्या विंग्रजीत आहेत. पुलंच्या कथाकथन आणि इतर गोष्टी सांगताना त्यांचे दोन-चारच फोटो पुन्हा पुन्हा दाखवलेयत.सिनेमात अधून मधून रंगमंचावर मनोज जोशी पुलंच्या रूपात कथावाचन करताना दिसतात. मूळ पुलंचा फोटो आहे, आणि वर निखिल रत्नपारखी पुलं जगत असतोच. इतके तीन तीन पुलं का हाही एक प्रश्न आहे. आदरांजली म्हणून मूळ पुलं नी असण्याशी मला हरकत नाही. मग निखिल रत्नपारखी आणि मनोज जोशी दोघे कशाला हवेत? एकानेच काम काम भागलं नसतं का? असो. सिनेमात पुलंची आई अगदी सर्वसामान्याला अगम्य (म्हणे शुद्ध गोवन) असलं कोंकणी बोलते. तीच गोष्ट सुनिताबाई आणि पुलंच्या लग्नाची. तिथे पण तीन फोटो(तीन सेकंदां)त त्यांचे प्रेमप्रकरण आणि लग्न आटोपून नंतर लक्षात न राहिलसं पाच मिनिटांचं गाणं खर्ची घातलंय. (बहुधा 'आहे मनोहर तरी' मध्ये वाचल्याप्रमाणे दोघांची भेट कॉलेजात शिकवताना न होता संघाच्या हापिसात झाली होती, आणि बर्‍याच ठिकाणी वाचल्याप्रमाणे लग्न घरातल्याच साडीवर नोंदणी पद्धतीने झाले होते. ते इथे शालू नेसून विधीवत होते.)
बाकी, काय बरं आहे हे सांगायचं तर शेवटाकडे चितळे मास्तर सॉल्लीड जमून आले आहेत, रावसाहेब मस्त रंगलेयत आणि 'इंद्रायणी काठी' हे गाणं छान जमून आलंय, आणि त्यातल्या त्यात सुनिताबाईच काय त्या आपला आब आणि भूमिकेचा बाज सांभाळून आहेत. थोडक्यात सिनेमाला माझ्याकडून दहापैकी अर्धा गुण. पुलं प्रेमींनी आणि एकूणच रसिकांनी पिक्चर न पाहता त्यांचं कोणतंही पुस्तक कुठल्याही पानाशी उघडावं आणि वाचावं.