Monday, June 28, 2010

कभी तनहाईयोंमें यूं!!!!

मघाशी चॅनेल सर्फ करता करता एका ठिकाणी थांबले.. “तुम अपना रंज-ओ-गम” लागले होते.. मला आठवली माझ्या कलेक्शनमधली पहिली कॅसेट... ओल्ड इज गोल्ड.. त्यातली सगळीच गाणी तेव्हा  माझ्यासाठी नवीन होती.

आठवीत असण्याच्या वयात हे गाणे पहिल्यांदा ऐकले.. तेव्हा अर्थ तेवढासा कळला नाही.. तरी गाणं मनाच्या कुठल्याशा कप्प्यात राहून गेलं होतं कुठेतरी... नंतर कधीतरी झी टीव्हीवर दुपारी मूव्ही लागला होता “शगुन”. मला यातली बहुतेक सगळी गाणी माहित होती.. तसेही घरचे सगळेजण अतिशय बोअर मूव्ही त्यातल्या फक्त गाण्यांसाठी पाहण्याच्या माझ्या सवयीला वैतागलेले असायचे.. नशीबाने तो मूव्ही दुपारीच लागला होता. अतिशय संथपणे कथा चालली होती..आणि गाण्याची पार्श्वभूमी कळाली. आधी प्रेमत्रिकोण आणि मग तिला कळतं की ती ज्याच्यावर प्रेम करते, तोच दुसर्‍याच कुणाचा आहे.. आणि तिच्या मनातले भाव हे गाणं सांगू लागतं!!




तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हें उनकी कसम ये दुख ये हैरानी मुज़े दे दो..


नाहीतरी तसेही तुझ्यासाठी मी महत्वाची नाहीच आहे. तुझ्या प्रेमाचे काही क्षणही माझ्या नशीबात नाही आहेत.. मग तुझे दु:ख माझ्या वाट्याला आले तर तसे तुला दु:ख होण्याचे काहीच कारण नाही.

ये माना मैं किसी काबिल नहीं हूं इन निगाहोंमे
बुरा क्या है अगर ये दुख ये हैरानी मुज़े दे दो


प्रेम म्हणे सगळे शिकवते.. पण इथे तर प्रेमातली हार तिला बरेच काही शिकवून गेलीय. तो जिथे असेल तिथे सुखात असावा नि त्यावर कोणतंही संकट येऊ नये यापरती दुसरी कुठलीच भावना तिच्या मनाला स्पर्शत नाही..

मैं देखूं तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती हैं
कोई इनके लिए अपनी निगेबानी मुझे दे दो


उर्मिला म्हणे लक्ष्मणासाठी चौदा वर्षे त्याची तहानभूक नि झोपही वागवत राहिली. आज भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा म्हणणारे तो चौदा वर्षे स्वत: न काही खाता व बिल्कुल विश्रांती न घेता भावाच्या कसा रक्षणार्थ उभा राहिला याचे दाखले देताना बिचार्‍या उर्मिलेला मात्र सहज विसरून जातात.. हिची अवस्थाही उर्मिलेपेक्षा काही जास्त वेगळी आहे असे नाहीए. त्याला काही होऊ नये, कुणी त्याला त्रास देऊ नये म्हणून तिला स्वत:चा वेळ, शक्ती खर्च  तर करायचीच आहे, नि बहुधा ते सगळे पुरं पडणार नाही, म्हणून तिला दुसर्‍या कुणाची ’निगेबानी’ ही हवी आहे...

ये दिल जो मैंने मांगा था मगर गैरोंने पाया था
बडी कैफ है अगर उसकी पशेमानी मुझे दे दो.


तिच्या प्रेमावर खरंतर दुसर्‍याच कुणाचा तरी हक्क आहे.. पण म्हणून ती स्वार्थापोटी आंधळी होत नाही. जे आहे ते नियतीने समोर वाढून ठेवलंय. तरीही कुठेतरी आशा आहे, आणि म्हणूनच तिला त्या दुसरीच्या ललाटीचा लेख आपल्या कपाळी हवाय. तसे झाले, तर नक्कीच तिला तिच्या स्वप्नांतला राजकुमार मिळेल..

जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते, तेव्हा तेव्हा गहिरं, निस्वार्थ प्रेम त्यातून ओथंबताना मला जाणवतं.. सारं स्वत्व, अभिमान , अहंकार त्या प्रेमापुढे गळून पडला आहे.. आणि एकच भावना उरलीय.. “तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो”!!!! त्या प्रेमाला माझा सलाम!!!!


प्रेम त्याग शिकवतं, सारे काही विसरून जायला लावतं. पण त्याच वेळेला जर त्या प्रेमाने विश्वासघात केला तर मात्र तडफड होते.. जीवाची तगमग होते.. आणि जनाची-मनाची पर्वा न करता सारा जीव ज्या प्रेमावर ओवाळून टाकला, त्याच प्रेमाला शाप द्यायलाही मग जीभ कचरत नाही.. माझ्या त्याच त्या कॅसेटमध्ये आणखे एक गाणं होतं, “कभी तनहाईयोंमें यूं”. स्नेहल भाट्करांचे गाणं म्ह्टलं की प्रत्येकाला आठवते तेच ते गाणं. नुसतं प्रेम करणारी व्यक्ती प्रेमभंग झाल्यावर पळभर हाय हाय म्हणेल, आणि पुन्हा जगरहाटीप्रमाणे सारे काही विसरून जाईल. पण हे उत्कट प्रेम जेव्हा होरपळून निघतं.. तेव्हा सर्व भावभावनांचा कडेलोट होतो, अणि तो कल्लोळ समोर येतो तो असा.





ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनिया
न फिर तू जी सकेगा और ना तुझको मौत आयेगी..
कभी तनहाईयोंमें यूं हमारे याद आयेगी
अधेरे छा रहे होंगे, और बिजली कांध जायेगी!!!


“न फिर तू जी सकेगा और ना तुझको मौत आयेगी..” यापरता शाप तो कोणता?? हे गाणं ऐकताना मीच नि:शब्द होते.


दोन गाणी, पण दोन टोकं आहेत.. प्रेमाची.. आणि तळतळाटाची.. पण तरीही अवीट.. नादमाधुर्याने ओथंबलेली.. आणि स्त्रीचं अंतरंग उलगडून दाखवणारी. म्हणणारे म्हणतात, तिरियाचरित्तर कोई ना जाने.. इतरांचे महित नाही.. पण या दोन गीतकारांना तरी नक्कीच कळालं होतं, असंच मी म्हणेन.

Wednesday, June 23, 2010

भ्रमाचा भोपळा!!!!


पुस्तक : बाकी शून्य 

लेखक:  वालावलकर कमलेश 

किंमत:  180.00 

प्रकाशक:  राजहंस प्रकाशन प्रा.लि.



मला न आवडलेलं पुस्तक म्हणजे : बाकी शून्य.
पुस्तकाचा विषय तसा सर्वश्रुत आहेच. एक तरूण, त्याचे लहानपण, पौगंडावस्था, कॉलेजजीवन नि नंतर उमेदवारीचे-नोकरीचे दिवस.. नि यात मालमसाला म्हणून कंटाळा, कंटाळ्याचा कंटाळा, दारू, भकाभका सिगरेट्स, मुली/बायका आणि त्यासंबंधीचे मुलांचे संभाषण, अर्वाच्य भाषा.. सतत येणारे 'झ'कार... आणि हे सगळं कमी की काय म्हणून निरर्थक तत्वज्ञान..
एखादे पुस्तक का आवडत नाही याची बरीच कारणे असू शकतात.. विषय न आवडणं, विषय आवडूनही त्याची मांडणी , सादरीकरण न आवडणं, भाषा न आवडणं!!!आता हे पुस्तक न आवडण्याचे कारण काय म्हणून सांगू??? काहीतरी तरी असायलाच पाहिजे.. तर पहिले आणि मोठे कारण म्हणजे: डोक्याला त्रास देणारे नि पानोपानी छळणारं तत्वज्ञान. पुस्तकभर 'भ', 'ल' ,'चु' आणि 'झ' काराशिवाय काही नाही.. तसे पाहायचं तर आत्मचरित्रपर पुस्तक आहे.. काही ठिकाणी विदारक, अत्यंत हेलाऊन टाकणारं आयुष्यात घडतही असेल, पण प्रत्येक वेळेस ते अशाच शब्दांत मांडायला पाहिजे असेच नाही.. या लेखकाला आपण का जगतोय, नोकरी का करायची वगैरे वगैरे आत्मपरिक्षणात्मक प्रश्न पडतात..ते तो सगळीकडे विचारत राहतो... पण ते विचार मांडून तो काय साधतो? काही नाही. नुसते प्रश्न उपस्थित करतो. बर्‍याचदा त्याला परिस्थितीपासून पळ काढायचाय (उदा. मृणालशी पहिल्यांदा संबंध येतात तो प्रसंग किंवा त्याला नवी नोकरी ऑफर केली जाते तो प्रसंग). बरे, ते विचार एका मार्गाने जातात का? ते ही नाही.. सगळ्या बाजूंनी घडलेल्या घटनेची कंटाळवाणी मीमांसा करत लेखक मध्येच कुठेतरी आपल्याला सोडून देतो. ठीक आहे, एखाद्याच्या मनात एकाच घटनेबाबत किती नि कसे कसे विचार येतात हेच जर दाखवायचेय, तर त्याला कधीतरी काहीतरी मानसिक बैठक तर असायला हवी. ते ही नाहीय. त्याच्या विचारातून त्याला स्वत:ला स्वतःपुरताही काहीही कधीही निष्कर्ष निघत नाही. तो स्वतःकडे काही कमीपणा घेत नाही.. काहीतरी चुकतेय पण तो चुकत नाही असे त्याला एकाच वेळी आणि नेहमीच वाटते. त्यामुळे ते सारे विचार भंपक , दांभिक, एकांगी, वरवरचे , बिनबुडाचे(आणखी कुणाकडे असले काही शब्द असतील तर उसने द्या रे..) वाटतात.
उदा. पुन्हा एकदा वरचाच प्रसंग. मृणालचा. असे घडून गेल्यानंतर एकतर अपराधी वाटेल किंवा जे झाले ते झाले, निभावून नेऊ असे वाटेल. पण यांचे त्यावरचे विचार(लग्न म्हणजे काय? लग्नसंस्था म्हणजे काय? मृणाल तिच्यावर संयम राखू शकली नाही... मग योनीशुचिता ती कसली... आणि परत असेच वाहात जाणारे शब्द) वाचून कुणाला जन्मात लग्न करण्याची इच्छा होईलसे वाटत नाही.. आणि निकिता की आणखी कोणाबरोबरच्या तरी संबंधानंतरचा निष्कर्ष म्हणजे सगळ्यावर कडी आहे.. "प्रत्येकाने लग्न करावे.. होता होईल तितके जोडीदारासोबत प्रामाणिक राहावे. शक्य नसेल तेव्हा प्रत्येकाने वेगळा जोडीदार शोधावा नि व्यभिचार करावा.. एकूणच काय बहु*वित्व ही समाजाची गरज आहे" हे वाचल्यानंतर मी कपाळावर हात मारून घेतला...
वरचा प्रकार म्हणजे मनात येणारे विचार. आता त्याचे इतरांसोबतचे संभाषण पाहू. त्याचे सगळेच मित्र दिसणार्‍या बायकांच्या अवयवांबद्दल बोलतात. काही नुसतेच संबंध ठेवण्याबाबत बोलतात, काहींची संबंध ठेवण्यापर्यंत मजल जाते, आणि ते त्या बायका शेअर करायलाही तयार असतात. बाकी राहिलेले संभाषण म्हणजे, उगीच अश्लाघ्य भाषेत समोरच्याला प्रश्न विचारले की तो पुढे काही बोलत नाही अशा छापाचे आहे.. असे बोलले की ऐकणाराच कानकोंडा होतो.. काही उत्तर देत नाही. मग हा असाच सारखा बोलत राहातो. उदा. त्याला मनःशांतीसाठी कुणीतरी गाईला नमस्कार करायला सांगतो.. मग हा विचारतो," ती गाय नैसर्गिक विधी करत असेल तरी करायचा का?" उत्तर हो येते. मग म्हणतो, "गायच कशाला हवी? आपल्या संस्थानाचा हत्ती फळाफळा मुतत आणि फदाफदा हगत गांवभर उंडारत असतो, त्यालाच नमस्कार करतो.." समोरचा यावर काय बोलणार, कप्पाळ? तो निश्चितच गप्प बसतो. असे झाले की मग लेखकाला कंटाळा येतो.. मग कंटाळ्याचाही कंटाळा येतो.. मग तो भसाभस सिगरेटी फुंकतो नि दारू ढोसतो.. ही जर कंटाळ्याची, दारू सिगरेटची तत्त्वज्ञानाची, भ/झ/ल/चु काराची वाक्ये पुस्तकातून काढली, तर पाचशेवीसातली दहा पानेही शिल्लक राहणार नाहीत..
स्वतःच्या देखणेपणाचं कौतुक तर सगळीकडे ओसांडून वाहतं. माणून पहिले आणि आत्यंतिक प्रेम स्वतःवरच करतो हे जरी मान्य असले तरी, किती म्हणून कौतुक ते करायचे? आणि म्हणून पुस्तकात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुली/अथवा बाईला याच्याकडून शरीरसंबंधाची इच्छा असते.(यात तो पाचवीत असतानाची एक सातवीतली शेजारीण येते, त्याची चुलत की मावस अशी बहीण येते नि बाकी भेटलेल्या निराळ्याच.) एक दोघी असतील एक वेळ पटलं असतं.. पण प्रत्येकजण???? कठीण आहे. आणि हो, त्या ते बिन्धास्तपणे बोलूनही दाखवतात.. बर्‍याचजणी त्याच्याकडून ती इच्छा पूर्ण करूनही घेतात. अपवाद फक्त एकच, निशा. कारण तिच्यावर हा एकतर्फी लाईन मारत असतो आणि तिच्या खिजगणतीतही नसतो.
भाषेच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार केला. एका तरूणाच्या जीवनात काय काय घडू शकतील असे प्रसंग(काही अतिशयोक्तीपूर्ण सोडले तर) आहेत. पण कोसला पार्ट-टू म्हणण्याइतके यात काही आहे असे मात्र वाटत नाही. आणि कितीही प्रयत्न केला, तरी वरती लिहिले आहे त्या पलीकडे काही सापडत नाही.. लेखकाचा मुख्य प्रॉब्लेम काय आहे हेच कळत नाही.. कंटाळा?? बायका???? ध्येय सापडत नाही??? जग मिथ्या आहे??? जाऊ दे.. त्याचे त्यालाच माहित नाही तर मी का डोके खपऊ???
लेखकच्याच भाषेत सांगायचे झाले तर पुस्तक वाचून डोक्याची झेडझेड झाली..
(खरंतर पुस्तक वाचून माझा शब्दकोष बराच समृद्ध झाला.. या पुस्तकाबद्दल त्याच भाषेत लिहावे असेही एकवेळ वाटले होते.. पण आपण एक आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली, त्यात इथल्या वाचकांचा दोष काय , म्हणून तो विचार बाजूला ठेवला.. Smile )

Monday, June 7, 2010

नाच गं घुमा!!!

आता नक्की आठवत नाही.. पण नागपंचमीच्या आधीची कुठली तरी एक तिथी असायची.. सगळ्यांना पंचमीच्या उंच उंच झोक्याचे वेध लागलेले असायचे.. पण त्याआधीच या तिथीपासून रात्रीचे खेळ चालू व्हायचे!! संध्याकाळपासूनच गल्लीतल्या बायका एकमेकींना आठवण द्यायला लागायच्या.. "आज रात्री जेवण झाल्यावर चौकात जमायचे हं!!!" मी तर पुष्कळ लहान होते .. त्यामुळे इकडे तिकडे निरोप पोचवण्याचं काम मध्ये मध्ये लुडबुड करणार्‍या वानरसेनेकडे आपसूकच यायचं. रात्री :३०-१०:०० चा सुमार झाला की एक-एक करून बायका जमू लागत.. गल्लीत हुंब्यांचे घर अगदी चौकात.. घराला ओटाही होता.. त्यामुळे ते सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण.. हुंबे आजी तशा खडूस, पण यादिवसांत त्या का कोण जाणे प्रेमळ वागायच्या.. मग जाधवांच्या दोन सुना, चव्हाणांच्या घरातल्या लेकीसुना, पाटीलकाकू, झालंच तर शेजारच्या गल्लीतल्या बायका, आम्ही शाळकरी -१० मुली, असे सगळे जमले की जो उतमात सुरू होई तो अगदी १२ वाजले तरी संपत नसे... लोळणफुगडी... बसफुगडी... कोंबडा... पिंगा.... झिम्मा...आणि बरंच काही!!! परवा शनिवारी मराठी बाणा पाहात होते.. मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झाला नि बरंच काही आठवत गेलं..

एकदा असेच नाचून नाचून थकलो होतो.. पण कुणालाच थांबावंसं वाटत नव्ह्तं. हुंबेआजी एकदम ओट्यावरून खाली उतरल्या. सगळ्याच दिलवाले मधे अमरिशपुरी नाचकामात आल्यावर थांबतात तशा थांबल्या. आजी येताना सुप घेऊनआल्या होत्या. आता या सुपाने कुणाला चोप देणार असं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच चेहर्‍यावर!!! त्या आल्या तशा रिंगणात मध्यभागी उभ्या राहिल्या नि म्हणाल्या, "म्हणा गं पोरींनो, नाच गं घुमा”. आणि काय त्या नाचल्या, यंव रेयंव!!! एका हाताने सुप धरायचं.. निमिषार्धात तो हात सोडायचा.. सूप अधांतरी राहू द्यायचं नि ते खाली यायच्या आधी दुस
र्‍या हाताने पकडायचं.. आणि हे करत करत स्वतःभोवती गोल गोल फिरायचं!!! दुसर्‍या दिवशी येताना घरोघरची सुपं बाहेर आली होती हे काय आता वेगळं सांगायला हवं???

लोळणफुगडी, बसफुगडी, साधी फुगडी नि कोंबड्याच्या स्पर्धा तर अगदी रोजच!!! आम्ही खेळणार म्हणून रस्ता अगदी चांगला झाडून, पाणी मारून तयार असायचाच. आधी जोड्या ठरत. मग एकमेकींसमोर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशी लांबलचक मांडी घालून बसायचं... दोन्ही हातानी दोन्ही अंगठे पकडायचे... डाव्या बाजूने असं कलंडायचं की पूर्ण पाठ जमिनीला लागली पाहिजे... नि मग धरलेले अंगठे सोडता, कुठल्याही आधाराशिवाय उजव्या बाजूने पूर्वस्थितीत यायचं. हे खेळताना "काठवट खणा.. सातारखाना" असले काहीतरी गाणं सुरू असायचं. हे असे हात सुटेपर्यंत चालायचं.. शेवटपर्यंत जी कुणी तग धरेल ती अर्थातच जिंकायची.. (कार्यक्रम संपवून घरी आल्या आल्या मी बेडवर हे करायचा प्रयत्न केला.. कलंडले खरी, पण उठायलाच येईना. :( मग काल हॉलमधलं सगळं फर्निचर एका बाजूला सारलं, थोडी लोळायला ऐसपैस जागा केली.. नि पुन्हा प्रयत्न केला.. हुश्श!!! जमलं एकदाचं!!! एवढी काही खूपच जड नि जाड झाले नाहीय अशी मनाची समजूतपण लगेच घालून घेतली!!!!)

बसफुगडी हे लठ्ठ लोकांचं काम नोहे. ती खेळायची म्हणजे आधी चवड्यावर बसायचं...नि एकदा उजवा पाय पुढे आणिडावा पाठीमागे, आणि दुसर्यांदा डावा पुढे नि उजवा मागे, असे वर्तुळात फिरवत राहायचे.. हात आपसूक जसे पाय हलतील तसे हलतात.. हे प्रकरण मात्र लोळणफुगडीपेक्षा अवघड!!! जास्त वेळ तग नाही धरता येत.. नेहमीची फुगडी घालताना फू बाई फू म्हणतात तसे ही फुगडी घालताना "चुईफुई" अशा सगळ्याजणी म्हणायच्या.. आम्ही मुलीमुळातच वात्रट.. आम्हाला हे चुईफुई गाणं नाही आवडायचं.. आम्ही मुद्दाम मोठ्यांदा "कुईफुई.. कुईफुई" म्हणत बसायचो.. (ही फुगडी काल एकदा घालून पाहिली.. पण कुठचे काय? दोनच मिनिटात पाय दुखायला लागले.. नि हात लढाई येत नसलेल्या शिपायासारखे अंमळ जास्तच आवेशात हलत होते.. छ्या: प्रॅक्टीस नाय राहिली!!!)

फुगडीच्या स्पर्धा म्हणजे अगदी कहर!!! गाणी म्हणून, कसंही ला , ला लावून एकमेकींची पिंग्यातून प्रेमळउणीदुणी काढून नि कमरेचे काटे ढिले करून झाले की फुगड्यांना सुरूवात व्हायची.. सगळ्यात आधी घामेजल्या ओल्या हातांना खडू/भस्म्/माती काहीतरी लावलं जायचं, नाहीतर मग ऐनवेळी हात सुटले तर तोल जाऊन पडण्याचीच शक्यता जास्त... नि वेगात असताना हात सुटले, तर कुठे जाऊन पडेल याचा नेम नाही. फुगड्यांची गाणी आता आठवत नाहीत.. पण आधीच्या हळूहळू गिरक्या लवकरच वेग घ्यायच्या.. मग नुसत्या गिरक्यांचा पण कंटाळा यायचा.. एका जोडीतली कुणीतरी अर्धवट खाली बसून जमिनीला एक पाय नि दुसरा अधांतरी ठेवून जातं घालायला लागली, की त्या संसर्गाची लागण लगेच व्हायची. . अशावेळी मग कुणाचं जातं जास्त वेळ टिकतं याची शर्यत लागायची. जातं घालता घालता फुगडी तशीच संपवणं यात काहीच नाही.. पण जात्यातून पुन्हा फुगडीसाठी उभं राहाणं हे खरं कौशल्याचे काम!!! अजूनही कधी फुगडी घालायचं म्हटलं की मी दोन्ही आणि एका पायावर सारख्याच उत्साहाने तयार असते!!!

खेळून खेळून काकू लोक दमले तरी आमचा उत्साह उतू जात असायचा.. बसलेल्या आयांच्या मागे "चला, उठा"चं टुमणं लावलं की "जा गं, कोंबडा कोंबडा खेळा" म्हणून त्या सुटवणूक करून घ्यायच्या!!! मग काय, आम्ही कानांत वारं शिरलेल्या वासरांसारखे धूम!! एक सुरवातीची नि दुसरी भोज्जाची रेष आखायची.. सुरूवातीच्या रेषेवर पायांवर पायठेऊन बसायचं.. दोन्ही हात गुडघ्यावर एकांवर एक.. नि शर्यत सुरू... मध्येच कुणी अडखळायचं.. ढोपरं फुटायची, खरचटायचं तरीही बिल्कुल रडारड करता पुन्हा कोंबड्याची पोज घेऊन शर्यत सुरूच र्हायची.. अगदीच चिल्लीपिली असतील ती सगळं झाल्यावर भ्वॉ म्हणून भोकाड पसरायची!!!

शाळकरी वयातल्या या गोष्टींची मजाच और होती!!! पंधरा दिवस हां हां म्हणता कसे निघून जायचे तेच कळायचे नाही.. दिवसभर शेतात, घरात काम करून थकलेल्या, नोकरी वरून आलेल्या बायकांना, दिवसभराचं हुंदाडणं जणू कमीच पडलेल्या आम्हा सर्वांसाठी ती पर्वणीच असायची.. कधी घराबाहेर पडणार्‍या पाटील काकू याच दिवसांत नवर्‍याशिवाय बाहेर पडत. मूल नाही म्हणून खंतावलेल्या, कधी कुणाशी बोलणार्‍या चव्हाण काकू याच दिवसांत हसताखेळताना दिसत.. नि नेहमी करवादणा
र्‍या हुंबेआजी नाचून थकलेल्या लेकीसुना आणि पोरीबाळींना मोठ्या प्रेमाने लिंबूसरबताचे ग्लासेस भरभरून देत असत.

आताशा नागपंचमीच्या वेळेस गांवी असणं खूप वर्षांत जमलं नाही. हुंबेआजी गेल्या... बरीच कुटुंबे काही कामाकारणाने गांव बदलून निघून गेली.. आणि हे आमचे छान रंगीबेरंगी दिवस चॅनेलच्या सुळसुळाटात हरवून गेले.

‍ ‍‍ ‍ ‍ ‍ ‍‍ ‍

Friday, June 4, 2010

आई.. आणि आठवणीतील गाणी!!!....३

या चटोर शब्दावरून आणखी आठवलं... शाळेत असताना नाचकामात.. म्हणजे तेच ते हो.. स्नेहसंमेलनात, हिंदी गाणी एवढी बोकाळली नव्हती तेव्हाचं म्हणतेय मी.. तेव्हा कृष्ण-राधेची गाणी चांगलीच पॉप्युलर होती.. मला लहानपणी 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे गाणं पुन्हा एकदा त्यातल्या चटोर शब्दांमुळं आवडायचं.. पण जेव्हा हे गाणं टीव्ही वर पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा कृष्ण म्हणून धुमाळांना बघून बिचार्‍या कृष्णाची कीव आली.. नंतर म्हणून त्या चटोर गाण्याच्या नि चटोर धुमाळांच्याही वाटेस गेले नाही!!!! Sad असो!!!


गणपाची मुलगी 'दिपका मांडिले तुला' ऐकून झोपते.. त्यावरून आठवलं, आमच्या घरातली आख्खी पिलावळ आईचं एक गाणं ऐकत झोपायची. अगदी भावापासून ते सध्या तीन वर्षाचा असलेल्या भाच्यापर्यंत. सगळ्या भाचरांत सर्वात जास्त लाड झाले ते मोठ्या भाचीचे.. घरातलं पहिलं बाळ!! साहजिकच डोक्यावर मिर्‍या वाटायचं.. अजूनही वाटतंच आहे..!!! भावाच्या 'दिपक' प्रकरणात तोंड दुखल्याने त्याला झोपवण्याची जबाबदारी मी कधीच घेतली नाही. पण या भाचीसमोर माझ्या निश्चयाने नांगी टाकली.. आधीच ती मला सोडून राहायची नाही.. नि झोप आल्यावर माझ्या मांडीवर डोकं ठेवून स्वतःच उंउं करत मान हलवायची.. मग कळायचं.. महाराणींना झोप आली ते!!! बाकी, हे गाणं मला माझ्या स्वतंत्र चालीत म्हणता येत नाही असं इतरांचं मत आहे.
Sad

आकाश अंगणी रांगत आला
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्यामध्ये बाळ झोपला
सृष्टी माऊली लागे गायला... जो बाळा जो जो रे जो!!!

निशामातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळ नीज भास्करा.. जो बाळा जो जो रे जो!!!

आनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा नीज चंद्रमा.. जो बाळा जो जो रे जो!!!

सृष्टीमाऊली आपल्या दोन मुलांना आलटून पालटून झोपवते, ही कल्पनाच कस्सली येडू आहे. हास्य
एकदा इथे मुंबईतच एका बारशाला जायचा योग आला.. नांव ठेवले.. पाळ्णा म्हणायची वेळ आली. पण 'पहिल्या दिवशी राजदरबारी' तर सोडाच हो पण अंमळ उत्साहाने पुढे आलेल्या मंडळाची गाडी 'हलके हलके जोजवा' च्या दोन ओळींवरच अडकली... मी म्हटलं, नाहीतरी तुम्हांला काहीतरी 'जो बाळा जो जो रे जो' च हवंय ना??? मी म्हणते गाणं!!! मग कुणीतरी, 'म्हण बै. तू पण वाट मिर्‍या' म्हणायचीच खोटी होती!!
मला वाटलं, की हे गाणं कुणाला माहितही नसेल. पण कुठलं काय?? तिथल्या बर्‍याच काकवांनी पण म्हणायला सुरुवात केली.. Party नंतर कळलं, त्यांना शाळेत पाचवी-सहावीच्या पुस्तकात ही कविता होती म्हणून.. नि नंतर सगळा प्रोग्रॅम राहिला बाजूला.. नि समस्त काकूमंडळ शाळेतल्या आठवणीत असं रमलं की यंव रे यंव!!! Big smile



आणखी एक कविता होती.. बहुतेक माझ्याच पहिलीच्या पुस्तकात असावी.. आता जसे मी आणी माझा भाचा जिंगल टून्समधली उंदराच्या टोपीची गोष्ट, 'हे काय आहे? असेल रूमाल!!!! ओहो.. आहा येईल धमाल" असं तालासुरात म्हणतो, तसे तेव्हा मी आणी आई ही कविता म्हणत असू.

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना!!!!!

या गाण्यात कधी मी चिमणी असे, तर कधी आई चिमणीची भूमिका करे. पण मग मला कावळेदादा, कपिलामावशी, पोपट्दादा व्हावं लागे. नि ते मला मुळीच नाही आवडायचं. मग आई मी काही ऐकेना म्हणजे 'आता तुला चिमणी होऊ देणार नाही' अशी धमकी द्यायची!!!


अजूनही पुष्कळशी गाणी आहेत.. मनाच्या कुपीत दडलेली... अशीच कधीतरी इच्छा होईल.. मी परत येईन एकदा आठवणींचा आणि गाण्यांचा खजिना घेऊन !!!

Thursday, June 3, 2010

चाँद तनहा है..

एके काळी मस्त लाईफ होती.. रोज संध्याका़ळी लायब्ररीत जाऊन नवीन पुस्तक आणायचं.. येईल तसा स्वयंपाक पक्षी: माझ्या नि फ्लॅटमेटच्या पोटावर प्रयोग करणारं काहीतरी बनवायचं.. ती आली की जेवायचं.. त्यानंतरच्याआवराआवरीचं आणि सास-बहू सिरियल पाहाण्याचं काम तिचं!! नि मी पळायचे माझ्या बेडरूममध्ये.. हातात पुस्तक.. नि सोबतीला.. विन ९४. वरचं खनक विथ रोशन अब्बास!!!! मस्त गाणी लागायची.. एक वाजेपर्यंत पुस्तक वाचूनसंपायचं आणि मी दुसर्या दिवशी नवीन पुस्तक आणायला सज्ज व्हायचे.. (रोज मला कुठलं पुस्तक द्यायचं म्हणूनतिथले लोक बिचारे वैतागले होते).

खनक आम्हा बर्याच जणांचा आवडता कार्यक्रम!! त्यात गुरूवारी रोशनऐवजी कुणीतरी यायचं.. एकदा अमीन सयानीहोस्ट होते.. नि त्यांनी त्यांच्या त्या टिपिकल आवाजात ओळख करून दिली..मीनाकुमारीने स्वतः लिहिलेल्या निस्वतःच गायलेल्या गझलांची.... नि वानगीदाखल ऐकवली तिची एक गझल.. "चाँद तनहा है.. आसमाँ तनहा!!!"

‍ ‍ माहित नाही ऐकताना नक्की काय वाटलं!!! पण त्या दिवशी पुस्तक पूर्ण नाही झालं.. :( नंतर ते गाणं शोधायचा खूपप्रयत्न केला.. खूप दिवसांनी असेच एकदा यूट्यूबवर Meena kuMaari : I write I recite या नावाने तो पूर्ण अल्बम मिळाला!!! :D





मीनाकुमारी.. शोकांतिकांची नायिका!!! तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बरंच छापून यायचं.. अजूनही कधी कधी येतं.. मला ती खूप आवडायची असे काही नाही.. पण कधी नावडलीही नाही.. तिचा तो खर्जातला आवाज नि आपके पाँव जमींपर मत रखिए हे मात्र चांगलंच लक्षात आहे!!!! तिची ही गझल ऐकताच मनात एक घर करून गेली.. का? ठाऊक नाही.. कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु: सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु: काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..




हापिसात यूट्यूब बॅन असणार्यांसाठी शब्दरचना येथे देतेयः

चांद तनहा है आसमां तनहा
दिल मिला है कहां कहां तनहा॥

जिंदगी क्या इसी को कहते हैं
जिस् तनहा है और जाँ तनहा॥

‍‍‍(जिथे काया आणि आत्मा देखील परक्यासारखे वागतात.. तिथे इतरांबद्दल काय बोलावं!!!! मी तरी इथं अगदी नि:शब्द!!)

हमसफर कोई गर मिले भी कहीं
दोनों चलते रहे तनहा तनहा॥

जलती बुझती सी रोशनी के परे
सिमटा सिमटा सा इक मकां तनहा॥

राह देखा करेगा सदियों तक
छोड़ जायेंगे ये जहां तनहा!!!


या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात.. भलामोठ्या आरशात स्वतःला पाहात उभी असलेली एकाकी रेखा.. नि "मेरे लिए भी क्या होई उदास बेकरार है" हा प्रश्न!!!! :(

स्मृतीचित्रे

एका वर्षी शाळेत एकदमच रमाबाई रानडे नि लक्ष्मीबाई टिळ्कांच्या शिक्षणावर दोन धडे होते.. त्यात त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांना शिकवणार्‍यांचे नि मदत करणार्‍यांचे काय हाल झाले होते याचं खुसखुशीत वर्णन दोघींनीही केलं होतं.. तसे आम्ही स्वतःची पुस्तकं सोडून अवांतरात जास्त रमणारी माणसं.. त्यातूनच एकदा बहिणीचे अकरा-बारावीचे पुस्तक वाचत होते.. त्यातही लक्ष्मीबाईंचा लेख होता.. हा मात्र आधी सारखा विनोदी नाही, तर त्यांना होणारा सासुरवास नि नवर्‍याचे धर्मांतर याबद्दल होता. स्मृतीचित्रे वाचायचं तेव्हाच मनात नक्की झालं होतं.. पण योग मात्र आता जुळून आला..

   पुस्तक तसे लिहिलंय खूप वर्षांपूर्वी.. पहिली आवृत्ती १५ डिसें १९३४ ची आहे.. तरी मराठी पुष्कळशी सोपी (पक्षी: बाळबोध) आहे.. तसे आत्मचरित्रच आहे पण जाता जाता त्या त्यांना समजतील तशा सामाजिक घडामोडींचेही वर्णन करायला विसरत नाहीत.. हा मुख्यतः १८६० ते १९२० चा कालखंड आहे.. मधून मधून त्या इंग्रजी शब्दही वापरतात.. याची मात्र मला गंमत वाटली.. बाकी, इतर आत्मचरित्रांत असलेला दोष इथे मला तरी आढळला नाही.. जे आहे.. जसे आहे.. ते त्या अगदी प्रांजळपणे कबूल करतात.. नि परिस्थितीने त्यांची थट्टा करण्याऐवजी त्याच परिस्थितीवर विनोद करतात..


                पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले ते चार भागांत.. आता मात्र चारही भाग एकत्रच उपलब्ध आहेत. पुस्तकाची सुरूवातच मुळी होते त्यांच्या बाबांच्या एका आठवणीपासून. त्यांच्या बाबांचे सोवळे ओवळे इतके कडक, की ते सोनेनाणें देखील धुवुन घ्यायचे म्हणे.. घरच्यांचे काय हाल होत असतील तेव्हा, ते देवालाच माहित!!! त्यानंतर त्यांचे टिळकांशी लग्न-त्याच्या हकिकती होतात न होतात तोच टिळकांचे घरून पळून जाण्याच्या सुरस कथा येतात. इथेच ते राजनांदगांवी असताना टिळकांच्या मनात लक्ष्मीबाईंच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. याच सुमारास टिळकांचा कल ख्रिस्त्ती धर्माकडे होऊ लागला होता.. त्यावेळच्या त्यांच्या डायरीतले काही उतारे टिळकांची मनःस्थिती सांगतात.. लक्ष्मीबाईंच्या कविता लेखनासही सुरूवात आणि टिळकांचे धर्मांतर यासोबत हा पहिला भाग संपतो...


     टिळकांनी धर्म बदलला तरी लक्ष्मीबाईंनी अद्याप बदलला नव्हता.. पण त्या काळात धर्म बदलणे ही लहान गोष्ट तर खचितच नव्हती.. अशावेळी त्यांचे शुद्धीकरण करून परत धर्मात घेण्याचे प्रयत्न झाले नसतील तर नवलच!!! पण टिळक आपल्या निर्णयावर अटळ होते. परिणाम व्हायचा तोच झाला.. समाजाने त्यांना एका अर्थाने वाळीत टाकले. भाड्याने राहण्यासाठी घर , एवढेच काय पण धुण्याभांड्याला बाई पण मिळेना.. हद्द म्हणजे एका घरमालकाने त्यांना घरातलं शौचालयही वापरू नाही दिले.. तेही जणू कर्मठ झाले होते..  =)) टिळकांचे धर्मांतराचे कारण त्या हिंदूधर्मातला जातीभेद असे देतात. यावेळपर्यंत प्लेगाने थैमान घातले होते. आणि हळूहळू लक्ष्मीबाईंच्या मनात पण जातिभेदातला फोलपणा लक्षात येऊ लागला होता.. नि त्यांचे मनही ख्रिस्तीधर्माकडे वळू लागले होते.. हा दुसरा भाग संपता संपता त्याही धर्म बदलून ख्रिस्ती होतात.. या भागात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते म्हणजे त्या अनाथ- गरीब मुलांना सांभाळायला सुरूवात करतात.. खरंतर त्यांना मुलांची खूप आवड.. पण त्यांना मुले झाली नाहीत असे नाही.. पण त्यातला दत्तू हा मुलगा सोडला तर विशेष कुणाला जास्त आयुष्य लाभले नाही..

    

       होता होता लक्ष्मीबाईंचा गोतावळा वाढला..  दरम्यान त्यांचे इतर ख्रिस्ती लोकांसोबत येणेजाणेही वाढले होते.. दत्तूचे लग्न.. त्याचा संसार मांडणे वगैरेसारख्या गोष्टीही त्या अशातच नमूद करून जातात.. आपले बालकवी त्यांच्याकडेच लहानाचे मोठे झाले. बरेचसे शब्द लक्ष्मीबाईंना सुचत पण लिहिताना अडचण येई. तेव्हा ठोंबरेच त्यांच्या मदतीला हजर होत.(शाळेतल्या धड्यात त्यांना पुस्तक लिहिताना मनुष्य हा शब्द अडला होता याची आठवण नि खास लक्ष्मीबाईंच्या मराठी शैलीतला :)  बालकवींनी लिहिलेला पुस्तकाचा अभिप्राय होता..) या बालकवींच्या आठवणींवरती त्यांनी एक आख्खे प्रकरण लिहिले आहे.. त्याच बरोबर त्यांचे अनेक मानसपुत्र नि मानसकन्या यांचा उल्लेखही जागोजागी आहेच आहे.  अशातच  टिळकांनी ख्रिस्तायन लिहिण्यासाठी सातार्‍याला बूड हलवले..  टिळक एके  ठिकाणी मान्य करतात की बुद्धीने मी ख्रिस्ती झालो होतो पण मनाने ख्रिस्ती व्हायला आणखी दहा वर्षे जावी लागली. त्यांची ही कथा.. तर इतरांचे काय??  ते अजूनही स्पृश्य-अस्पृश्यतेच्या कल्पनांना कवटाळून तर होतेच.. नि वर मिशनर्‍यांनी त्यांना पंगुही करून ठेवले होते..  या सगळ्या आठवणी त्या टिळकांनी त्या-त्या वेळी लिहिलेल्या कवितांसह उद्धृत करतात.. हा तिसरा भाग टिळकांच्या मृत्यूच्या प्रकरणाने संपतो

        पुस्तकाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतरचे बाईंचे मुंबईमधले वास्तव्य आणि एका मिशनरी वसतीगृहात मेट्रनची नोकरी. येथे आल्यावर त्या जुजबी इंग्रजीही लिहायला वाचायला शिकल्या.. तिथे त्या एकदा मुलींना पिकनिकला म्हणून जुहू बीचवर घेऊन गेल्या नि अचानक समुद्राला भरती आली.. लहानथोर सर्व मुलींना वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली..  एक मुलगी समुद्रात बुडाली नि कधी नव्हे ते आयुष्यात उतारवयात कोर्टाची पायरीही चढावी लागली. या प्रकरणात त्यांना बराच मनस्ताप सोसावा लागला..  भरीस भर म्हणून त्यांच्या घरातले मृत्यूसत्र तर चांगलेच चालले.. सुरूवात ठोंबरे(पक्षी: बालकवी) नी केली.. त्यानंतर स्वतः टिळक.. इतर नातेवाईक.. ज्यांना प्राणपणाने जपल्या त्या अकरा मुली.. पंडिता रमाबाई.. अशी एकंदर बीव-बावीस माणसे वीस-बावीस महिन्यांत गेली.. माणूस कितीही धीराचा असला.. तरी अशा वेळेस मनाची अवस्था काय होत असेल याची कल्पनासुद्धा न केलेली बरी..  बाईंची प्रकृतीही खालावली. तेव्हा त्यांना सर्वांनी हवापालटास जायला सुचवले नि  त्या सहपरिवार एका डॉक्टरीणबाईंकडे कराचीला गेल्या.. त्यांचे बस्तान लावून मुलगा परत मुंबईला आला.. नि त्या पुन्हा घरची कर्ती बनल्या..  कराचीतली गोषा पद्धती.. भाजीखरेदी.. भाड्याची घरे शोधणे.. कचरा फेकणारे शेजारी या  गोष्टी सांगता सांगता पुस्तक  इथेच संपते..

     वास्तविकतः त्यांनी रूढार्थाने कसलेही शिक्षण घेतले नव्हते.. नवर्‍याने शिकवले म्हणून त्या मराठी लिहायला वाचायला शिकल्या.. नि जसजशी गरज पडत गेली तशतशा नवीन गोष्टीही शिकत गेल्या.. आयुष्यातले प्रसंग त्या लिहित तर होत्याच आणि त्या कविताही करू लागल्या..बर्‍याचजणांना या कविता टिळच करत असे वाट्त असे!!!!(हे वाचताना मला सुनीताबाई आणि पुलंचा अवघड वळणात गाडी अडकण्याचा प्रसंग आठवला.. ;) असो.) आत्मचरित्रातल्या  प्रसंगांचे वर्णन तटस्थपणे त्या करतातच.. "मी नाही हो अशी" असा सूरही वाचताना कुठे जाणवत नाही..  बहुतेक सारे दु:खाचे प्रसंगांचे वर्णन त्या विनोदाने करतात.. मात्र तो कुठे बोचत नाही वा अंगावरही येत नाही.. त्यामुळेच  पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेले "प्रसन्न आणि गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल" हे वाक्यही तितकेच सार्थ ठरते.. पुस्तकात इंग्रजी शब्दांचा वापर अनेक ठिकाणी झाला आहेच.. नि कुठे कुठे त्या शब्दांना छान मराठी रूपडंही बहाल केलंय.. उदा. व्ही.पी चे अनेकवचन.. व्हीप्या!!! :) कदाचित त्यांचे हे सगळे लेखनसामर्थ्य पाहूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना साहित्यलक्ष्मी पदवी बहाल केली असेल..

Wednesday, June 2, 2010

डी रिअर विंडो!!!!


सुटीत बरंच काही लिहायचं ठरवलं होतंच॥ आज सकाळी मोडकांना यादी वाचून दाखवली तर ते म्हणाले, "तुला लिहिण्यासाठी नि मला वाचण्यासाठी शुभेच्छा"!!! :)
तर,यादीतील पहिलं स्थान आहे ते रिअर विंडो ला!!
रिअर विंडो... हिचकॉकचा मी पाहिलेला पहिला चित्रपट!!!

नायक जेफ्री(जेम्स स्ट्युअर्ट) -प्रोफेशनल फोटोग्राफर-एकदा फोटोग्राफी करताना त्याचा अपघात होतो आणि त्याच्यावर घरी बसण्याची सक्ती होते. आधीच उन्हाळा नि त्यातच घरी बसून कंटाळलेला तो.. खिडकीत बसून आजूबाजूच्या कुटुंबांचे निरिक्षण करू लागतो.. त्याचे शेजारी असतात, एक बॅले डान्सर..: जी घरी सुद्धा अप्लवस्त्रांत बॅलेच करत असते, एक संगीतकार..: थोडासा वैतागलेला, एक एकाकी प्रौढा....:मिस लोनलीहार्ट, एक सेल्समन..: मि.टोरवाल्ड नि त्याची सतत आजारी पत्नी, एक नवीनच लग्न झालेले जोडपे, एक उन्हाळा सहन होत नाही म्हणून बाहेर फायर एस्केपमध्ये झोपणारे जोडपे.. यांच्याकडे एक कुत्राही आहे, आणि एक कमी ऐकू येणारी.. शिल्पकार..!!! यांच्यासोबत त्याच्या आयुष्यात आणखी दोन व्यक्ती असतात.. एक त्याची नर्स नि दुसरी त्याची मैत्रिण.. लिसा(ग्रेस केली)!!

सुरूवातीला चित्रपट थोडासा रटाळवाणा संथ जातो.. पण हळूहळू आपणही त्या वातावरणाचा भाग बनतो नि कोण कुठे राहते हे नीट लक्षात राहते. निरिक्षण करता करता जेफ्रीच्या लक्षात येते की मि टोरवाल्ड भर पावसात.. रात्रीबेरात्री येजा करत असतो. त्याचे त्याच्या आजारी पत्नीसोबत खटकेही उडत असतात.. आधी त्याच्या या टाईमपासला नाक मुरडणारी लिसा ही हळूहळू त्यात रस घ्यायला लागते. यातच सौ. टोरवाल्ड गायब होतात. तिला बाहेर जाताना जेफ्रीने पाहिलेले नसते. नि काही काळानंतर टोरवाल्डच्या घरून एक मोठा बॉक्स बाहेर पाठवला जातो. त्याने त्याच्या बायकोचा खून करून तिला त्यात घालून तिची विल्हेवाट लावली असा त्याचा समज होतो

आता तो आपल्या कामात त्याच्या पोलिस मित्रालाही सामील करून घेतो. नर्सही नकळत यात गुंतते. दरम्यान तो लिसाला टोरवाल्ड घरी नसताना त्याच्या नावे एक पत्र टाकायला सांगतो.. हेतू हा की, त्याची यावर काय प्रतिक्रिया होते हे त्याला पाहायचे असतं.. पण याने टोरवाल्डला आपल्यावर सतत कुणीतरी नजर ठेऊन आहे हे कळतं. भरीस भर म्हणून जेफ्री टोरवाल्डला एके ठिकाणी भेटायला बोलावतो.. आणि लिसा नर्सला समोरच्या बागेत एका कुत्र्याने थोडेसे उकरलेले असते(हा कुत्रा तोवर अचानक मान मुरगाळल्याने मेलेला असतो) तिथे काय आहे ते पाहायला सांगतो. लिसा शहाणपणा करून टोरवाल्डच्या घरात घुसते नि तेव्हाच अचानक परत आलेला टोरवाल्ड तिला रंगेहाथ पकडतो. जेफ्रीने बोलावलेले पोलीस तिला वाचवायला तिथे पोचतात नि याचवेळी त्याच्या लक्षात येतं की लिसा समोरच्या अपार्टमेंटमध्ये कुणालातरी इशारा करत आहे. या सर्वाच्या मुळाशी कोण आहे हे त्याच्या लक्षात येते.

नर्स लिसाला जामीनावर सोडवून आणायला पोलिस स्टेशनमध्ये जाते नि जेफ्री घरी एकटाच राहतो. तो पोलिस डिटेक्टिव्ह मित्राला घडला प्रकार सांगतो. नि कुठेतरी पाणी मुरतंय हे त्यालाही पटतं. नि याच वेळी टोरवाल्ड जेफ्रीच्या घरी येतो. खुर्चीला खिळून असणारा जेफ्री स्वसंरक्षणार्थ कॅमेर्याचे फ्लॅशलाईट्स वापरून टोरवाल्डचे डोळे दिपवण्याचा प्रयत्न करतो... पण त्याचाही काही उपयोग होत नाही. तो जेफ्रीला त्याच रिअर विंडो मधून खाली ढकलून देतो नि सुदैवाने पण नेहमी उशीरा येणारे पोलीस त्याला अर्धवट झेलतात.

सिनेमा संपतो त्तेव्हा हिवाळा चालू झालेला असतो... संगीतकार नि मिस लोनलीहार्टची मैत्री झालेली असते... बॅले डान्सरला तिचा मित्र भेटायला येतो... कुत्रेवाल्याकडे नवीन कुत्रा आलेला असतो.. शिल्पकार आजी मस्त उन्हात आरामखुर्चीत आराम करत असतात.. टोरवाल्डचं घर नवीन लोकांसाठी सज्ज होत असते... नवपरिणीत जोडप्याचे लग्न चांगलेच मुरलेले असते.. नि जेफ्री दोन्ही पाय जायबंदी होऊन पडलेला असतो.. शेजारी अर्थातच लिसा असते.. ती त्याला दाखवायला म्हणून "बियॉन्ड हाय हिमालयाज" पण खरेतर एक फॅशन मॅगेझिन वाचत असते..!!! :)

जरी हा रहस्यपट असला.. तरी यात गूढ किंवा कनठाळ्या बसवणारे संगीत नाही... चित्रविचित्र किंवा गूढ बोलणारी पात्रे नाहीत.. टोरवाल्डनेच त्याच्या बायकोचा खून केला हे आधीच लक्षात येतं पण त्यामुळे चित्रपटाची रंगत बिल्कुल कमी होत नाही.. पूर्ण चित्रपट घडतो ते ही एकाच अपार्ट्मेंट मध्ये.. तरी काही चुकलंय असंही वाटत नाही!!! ग्रेस केली.. नॉर्मा शिअरर ही नांवे नाथा कामत मध्ये फक्त वाचली होती.. पण प्रत्यक्षात ती दिसते कशी, हे इथेच प्रथम पाहिले..!!!

हे रिअर विंडो मधून दिसणार्‍या दृष्याचे म्युरल:


जाता जाता, चित्रपट तर आवडलाच.. पण आणखीही एक गोष्ट मला आवडली.. ती म्हणजे ग्रेस केलीची सूटकेस.. तिच्या त्या एवढुशा सूटकेसमध्ये तिचा नाईट गाऊन चपलेसह मावतो!!! आहे की नाही गंमत???