Monday, June 28, 2010

कभी तनहाईयोंमें यूं!!!!

मघाशी चॅनेल सर्फ करता करता एका ठिकाणी थांबले.. “तुम अपना रंज-ओ-गम” लागले होते.. मला आठवली माझ्या कलेक्शनमधली पहिली कॅसेट... ओल्ड इज गोल्ड.. त्यातली सगळीच गाणी तेव्हा  माझ्यासाठी नवीन होती.

आठवीत असण्याच्या वयात हे गाणे पहिल्यांदा ऐकले.. तेव्हा अर्थ तेवढासा कळला नाही.. तरी गाणं मनाच्या कुठल्याशा कप्प्यात राहून गेलं होतं कुठेतरी... नंतर कधीतरी झी टीव्हीवर दुपारी मूव्ही लागला होता “शगुन”. मला यातली बहुतेक सगळी गाणी माहित होती.. तसेही घरचे सगळेजण अतिशय बोअर मूव्ही त्यातल्या फक्त गाण्यांसाठी पाहण्याच्या माझ्या सवयीला वैतागलेले असायचे.. नशीबाने तो मूव्ही दुपारीच लागला होता. अतिशय संथपणे कथा चालली होती..आणि गाण्याची पार्श्वभूमी कळाली. आधी प्रेमत्रिकोण आणि मग तिला कळतं की ती ज्याच्यावर प्रेम करते, तोच दुसर्‍याच कुणाचा आहे.. आणि तिच्या मनातले भाव हे गाणं सांगू लागतं!!




तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हें उनकी कसम ये दुख ये हैरानी मुज़े दे दो..


नाहीतरी तसेही तुझ्यासाठी मी महत्वाची नाहीच आहे. तुझ्या प्रेमाचे काही क्षणही माझ्या नशीबात नाही आहेत.. मग तुझे दु:ख माझ्या वाट्याला आले तर तसे तुला दु:ख होण्याचे काहीच कारण नाही.

ये माना मैं किसी काबिल नहीं हूं इन निगाहोंमे
बुरा क्या है अगर ये दुख ये हैरानी मुज़े दे दो


प्रेम म्हणे सगळे शिकवते.. पण इथे तर प्रेमातली हार तिला बरेच काही शिकवून गेलीय. तो जिथे असेल तिथे सुखात असावा नि त्यावर कोणतंही संकट येऊ नये यापरती दुसरी कुठलीच भावना तिच्या मनाला स्पर्शत नाही..

मैं देखूं तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती हैं
कोई इनके लिए अपनी निगेबानी मुझे दे दो


उर्मिला म्हणे लक्ष्मणासाठी चौदा वर्षे त्याची तहानभूक नि झोपही वागवत राहिली. आज भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा म्हणणारे तो चौदा वर्षे स्वत: न काही खाता व बिल्कुल विश्रांती न घेता भावाच्या कसा रक्षणार्थ उभा राहिला याचे दाखले देताना बिचार्‍या उर्मिलेला मात्र सहज विसरून जातात.. हिची अवस्थाही उर्मिलेपेक्षा काही जास्त वेगळी आहे असे नाहीए. त्याला काही होऊ नये, कुणी त्याला त्रास देऊ नये म्हणून तिला स्वत:चा वेळ, शक्ती खर्च  तर करायचीच आहे, नि बहुधा ते सगळे पुरं पडणार नाही, म्हणून तिला दुसर्‍या कुणाची ’निगेबानी’ ही हवी आहे...

ये दिल जो मैंने मांगा था मगर गैरोंने पाया था
बडी कैफ है अगर उसकी पशेमानी मुझे दे दो.


तिच्या प्रेमावर खरंतर दुसर्‍याच कुणाचा तरी हक्क आहे.. पण म्हणून ती स्वार्थापोटी आंधळी होत नाही. जे आहे ते नियतीने समोर वाढून ठेवलंय. तरीही कुठेतरी आशा आहे, आणि म्हणूनच तिला त्या दुसरीच्या ललाटीचा लेख आपल्या कपाळी हवाय. तसे झाले, तर नक्कीच तिला तिच्या स्वप्नांतला राजकुमार मिळेल..

जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते, तेव्हा तेव्हा गहिरं, निस्वार्थ प्रेम त्यातून ओथंबताना मला जाणवतं.. सारं स्वत्व, अभिमान , अहंकार त्या प्रेमापुढे गळून पडला आहे.. आणि एकच भावना उरलीय.. “तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो”!!!! त्या प्रेमाला माझा सलाम!!!!


प्रेम त्याग शिकवतं, सारे काही विसरून जायला लावतं. पण त्याच वेळेला जर त्या प्रेमाने विश्वासघात केला तर मात्र तडफड होते.. जीवाची तगमग होते.. आणि जनाची-मनाची पर्वा न करता सारा जीव ज्या प्रेमावर ओवाळून टाकला, त्याच प्रेमाला शाप द्यायलाही मग जीभ कचरत नाही.. माझ्या त्याच त्या कॅसेटमध्ये आणखे एक गाणं होतं, “कभी तनहाईयोंमें यूं”. स्नेहल भाट्करांचे गाणं म्ह्टलं की प्रत्येकाला आठवते तेच ते गाणं. नुसतं प्रेम करणारी व्यक्ती प्रेमभंग झाल्यावर पळभर हाय हाय म्हणेल, आणि पुन्हा जगरहाटीप्रमाणे सारे काही विसरून जाईल. पण हे उत्कट प्रेम जेव्हा होरपळून निघतं.. तेव्हा सर्व भावभावनांचा कडेलोट होतो, अणि तो कल्लोळ समोर येतो तो असा.





ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनिया
न फिर तू जी सकेगा और ना तुझको मौत आयेगी..
कभी तनहाईयोंमें यूं हमारे याद आयेगी
अधेरे छा रहे होंगे, और बिजली कांध जायेगी!!!


“न फिर तू जी सकेगा और ना तुझको मौत आयेगी..” यापरता शाप तो कोणता?? हे गाणं ऐकताना मीच नि:शब्द होते.


दोन गाणी, पण दोन टोकं आहेत.. प्रेमाची.. आणि तळतळाटाची.. पण तरीही अवीट.. नादमाधुर्याने ओथंबलेली.. आणि स्त्रीचं अंतरंग उलगडून दाखवणारी. म्हणणारे म्हणतात, तिरियाचरित्तर कोई ना जाने.. इतरांचे महित नाही.. पण या दोन गीतकारांना तरी नक्कीच कळालं होतं, असंच मी म्हणेन.

3 comments:

yugandhar said...

'Kabhi Tanhaiyon mein' la salam. Manatla ek kopra ayushabhar vyapun takalele gane, sarvarthane.

New to this, that's why searching for marathi board for 'Pratikriya', Hope will learn it.

Unknown said...

वाह...

Anonymous said...

मन हलवून जात ह्या गाण्यानी... मी अजून पण मूकच आहे